तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली. राजभवन येथे मंगळवारी (२१ जानेवारी) झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना मुख्य न्यायाधीशपदाची शपथ दिली.
सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने तेलंगाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस केली होती. केंद्र सरकारने या शिफारसनंतर न्यायमूर्ती आराधे यांची मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त केली.
मुख्य न्यायाधीशपदाची शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्या. आराधे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याशपथविधी सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते.
आलोक अराधे यांचा जन्म १३ एप्रिल १९६४ रोजी रायपूर,छत्तीसगड येथे झाला. त्यांनी १२ जुलै १९८८ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात त्यांनी नागरी आणि घटनात्मक प्रकरणांवर काम केले. एप्रिल २००७ मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली.
न्यायमूर्ती आराधे यांची २००९मध्ये मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. २०११ मध्ये ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले.त्यांनी २०१६मध्ये जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात काम केले. २०१८ मध्येत्यांनी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केले. २०२३ मध्ये त्यांची तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
संबंधित बातम्या