Assembly Session : पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं; आता ‘या’ तारखेपासून सुरू होणार!
राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढं ढकलण्यात आले आहे. १० ऑगस्टपासून सुरू होणारे अधिवेशन आता १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच होणारे राज्य विधीमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Assembly Session) पुढे ढकलण्यात आले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हे अधिवेशन १० ऑगस्टपासून सुरू होणार होते. मात्र उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन एक आठवड्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Session) १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, आधी अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार होते. यासंदर्भात राज्याच्या विधीमंडळ सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र, आता या अधिवेशनाची तारीख बदलली आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारानंतर मंत्र्यांना आपले कामकाज समजून घेण्यासाठी जवळपास चार दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे या अधिवेशनाची तारीख बदलल्याचे बोलले जात आहे. यानुसार राज्याच्या विधीमंडळाचे आगामी अधिवेशन १७ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत असल्याची शक्यता वर्तविली जाते.
मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने आत्तापर्यंत विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत कायम दिसत असल्याने त्याची देखील चर्चा महाराष्ट्राच्याराजकारणात होती. आता उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळात विस्तारात नेमकं मंत्रिपद कोणाला मिळणार? याकडे देखील लक्ष लागले आहे. याशिवाय, यानंतर होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या