मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेला दणका! मुंबई महापालिकेच्या कामकाजाची ‘कॅग’ मार्फत होणार चौकशी, फडणवीसांची घोषणा

शिवसेनेला दणका! मुंबई महापालिकेच्या कामकाजाची ‘कॅग’ मार्फत होणार चौकशी, फडणवीसांची घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 24, 2022 05:40 PM IST

मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांची कॅगकडून चौकशी केली जाईल, असं म्हटले आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

मुंबई – महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच कलगीतुरा रंगला आहे. विधानसभेत प्रभाग रचनेवर विधेयक मांडण्यात आलं असता वादळी चर्चा झाली. दरम्यान आज आदित्य ठाकरेंनी मंबई पालिकेच्या प्रभाग रचनेबाबतचा मुद्दा अधिवशेनात उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांची कॅगकडून चौकशी केली जाईल, असं म्हटले आहे. 

मुंबई महापालिकेतील विविध कामांमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला. त्यावर चौकशीचा निव्वळ फार्स करता येणार नाही, मुंबई महापालिकेचे कॅग (CAG) चे विशेष ऑडिट करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

प्रभाग रचनेबाबत करण्यात आलेल्या चर्चेच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  दोषींना पाठीशी घातले जाणार नाही, तसंच सूडभावनेने कोणावरही कारवाई होणार नाही. पालिकेची नवी प्रभाग रचना चुकीची आहे. २०२१ ची जनगणना पूर्ण झाल्यानंतर  पालिकेतील सदस्यसंख्येत वाढ करणं योग्य ठरेल अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

विधानसभेत प्रभाग रचनेवर विधेयक मांडण्यात आले. त्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये वादळी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान शिवसेना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, २२ ऑगस्ट २०२२ मधील आदेशात सुप्रीम कोर्टाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र निवडणुका  उद्याच असल्याप्रमाणे घाई का केली जात आहे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. सरकार घटनाबाह्य आहे, यावर मी काही बोलणार नाही, मात्र सर्व काही घटनाबाह्य करायचं आहे का? असा टोलाही आदित्य यांनी लगावला. 

यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, दर १० वर्षांनी लोकसंख्येची मोजणी होते आणि त्यानुसार प्रभागाचे क्रमांक वाढवले जातात. २० टक्क्यांच्या लोकसंख्येला आपण सहा प्रभाग वाढवले आणि ३.८ टक्के लोकसंख्येला नऊ प्रभाग वाढवले, ही विसंगती आहे. मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात ८९२ तक्रारी करण्यात आल्या आहेत. आपण कायद्याविरोधात जाऊन कोणताही निर्णय घेणार नाही, असं सांगत एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचून दाखवला.

IPL_Entry_Point