Border Dispute: हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला; शिंदे सरकारनं हिंमत दाखवावी; अजित पवार भडकले!
Ajit Pawar on Border Dispute: महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात झालेल्या हल्ल्यानंतर आता राज्य सरकारनं 'अरे'ला 'कारे' करण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणी अजित पवार यांनी केलं आहे.
Ajit Pawar on Maharashtra Karnataka Border Dispute: मराठी भाषिक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं आता 'अरे'ला 'कारे' करण्याची हिंमत दाखवावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
'महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारनं खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. 'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारनं दाखवावी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
'कर्नाटक सरकारच्या पाठिंब्यामुळंच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारनं या संदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्र सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजुटीनं सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभे आहेत. सत्ताधारी पक्षांनीही आपलं कर्तव्य पार पाडावं. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेवू नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
विभाग