महाराष्ट्राचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. तापमान व उकाड्याने जनता हैराण झाली आहे. उकाड्याने अंगाची लाही लाही होत असतानाच आता राज्यात उष्णतेची लाट (Heat wave in Maharashtra) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील वाढती उष्णता पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी सरकारला आवाहन केले आहे, राज्यातील शाळांना आताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा.
हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. त्यातच आता राज (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) पत्र लिहून सर्व शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरेंनी सरकारला लहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. उर्वरित महाराष्ट्रातील स्थितीही काही वेगळी नाही. उष्णतेची लाट आली आहे, असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.', असे म्हणत राज ठाकरे यांनी हवामान खात्याने आधीच उष्णतेची लाट येण्याची कल्पना का नाही दिली असा सवाल उपस्थित केला आहे.
उन्हाळा अजून खूप शिल्लक आहे. जर हवामानातील बदलांची बिनचूक भविष्यवाणी केली गेली तर लोक आपल्या दैनंदिन व्यवहाराबाबत काही योजना बनवू शकतात.
अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली,तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे (summer holidays in schools) निर्देश देण्याची तजवीज करायला हवी.
त्याचबरोबर राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. कडाक्याच्या उन्हामध्ये नागरिकांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केलं आहे.
बिचारे प्राणी आणि पक्षी तर पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा', असे आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना केलं आहे.
संबंधित बातम्या