मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित व्यावसायिक मराठी आणि बहुभाषिक चित्रपट बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले घाट, विहिरी आणि पाणी वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षण करून त्यांच्या संवर्धनासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यभरातील महिलांसाठी आदिशक्ती मिशन राबविण्याचा आणि आदिशक्ती पुरस्कार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ज्या ग्रामपंचायतींनी ही आदिशक्ती मोहीम चांगल्या प्रकारे राबविली आहे, त्यांना आदिशक्ती पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही योजना राबविण्यासाठी १० कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
राज्यात जनजागृती चळवळीच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजात जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय कुपोषण, अर्भक मृत्यूदर, माता मृत्यूदर कमी करणे, लिंगभेद दूर करून मुलींमधील शिक्षणाचा स्तर वाढविणे, तसेच बालविवाहमुक्त समाजाची निर्मिती करणे, लैंगिक व शारीरिक अत्याचार रोखणे व अनिष्ट ांचे उच्चाटन करणे, महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणे, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आदी निर्णय शासनाने घेतले आहेत.
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकार 'यशवंत विद्यार्थी योजना' राबवणार असल्याचेही सरकारने म्हटले आहे. या अंतर्गत दरवर्षी १० हजार विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण दिले जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजनेंतर्गत धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी २०२२-२५ ऐवजी २०२८ पर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश २०२५ जारी करण्याचा निर्णय ही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
संबंधित बातम्या