Sanjay Raut Tweet: महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं, संजय राऊतांचे ट्विट
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटने राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याची शक्यता दाट झाली आहे.
Sanjay Raut Tweet: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात होती. शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्याशी दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटने राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याची शक्यता दाट झाली आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्विट केलं आहे
संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलतना एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद सुरू असून सर्वजण परत येतील असा विश्वास व्यक्त केला होता. आत्ताचे हे बंड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच घडवून आणल्याच्या चर्चा माध्यमात सुरु होत्या. मात्र हे वृत्त संजय राऊतांनी फेटाळून लावलं होतं. ‘शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही. समोरासमोर येऊन लढाई लढते. आम्हचा पक्ष संघर्ष करणारा पक्ष असून या घडामोडींमधून जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. सत्ता परत मिळवता येईल… राखेतून जन्म घेण्याची ताकद शिवसेनेत आहे. परंतु पक्षाची प्रतिष्ठा कायम राखणे हे महत्वाचे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदार
सध्या एकूण ३६ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. यामध्ये शिवसेनेचे ३३ तर उरलेले ३ अपक्ष आमदार आहेत. सध्या राष्ट्रवादीचे कुणी संपर्कात नाही मात्र काँग्रेसचे काही आमदार सोबत येतील असा दावा बच्चू कडू यांनी केला असून एकनाथ शिंदेंसोबत येणाऱ्या आमदारांची संख्या ५० पर्यंत जाईल असं बच्चू कडू म्हणाले होते. बच्चू कडू हेसुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत आहेत.