मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Agriculture News : सरकारचा दिलासा ! अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी १७७ कोटी रुपयांची मदत

Agriculture News : सरकारचा दिलासा ! अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी १७७ कोटी रुपयांची मदत

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 11, 2023 07:13 AM IST

State government relief to Farmer : राज्यात अवकाळी पावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मार्चमध्ये झालेल्या या पावसाचा तब्बल १ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांना याचा फटका बसला होता. या नुकसानी पोटी भरपाई म्हणून शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Agriculture News
Agriculture News

मुंबई : राज्यात मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तब्बल १ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांना याचा फटका बसला. या पावसामुळे रब्बी पिकांना आणि फलबागांना सर्वाधिक फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला. ४ मार्च ते ८ मार्च आणि १६ ते १९ मार्च दरम्यान अवकळी पावसाने राज्याला झोडपले. पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. शेती पिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.

राज्य शासनाने अमरावती विभागासाठी २४ कोटी ५७ लाख ९५ हजार, नाशिक विभागासाठी ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, पुणे विभागासाठी ५ कोटी ३७ लाख ७० हजार रुपये, छत्रपती संभाजी नगरविभागासाठी ८४ कोटी ७५ लाख १९ हजार असा एकूण १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

 

WhatsApp channel