Maharashtra Assembly Elections 2024 : माजी मंत्री व ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज प्रचंड गर्दीत वरळी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिल्याच्या प्रश्नावर बोलताना यावेळी त्यांनी मनसेला जोरदार टोला हाणला.
आदित्य ठाकरे हे दुसऱ्यांदा वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या मतदारसंघाला लागून असलेल्या माहीम विधानसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव रिंगणात आहेत. २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेनं उमेदवार दिला नव्हता. मात्र, अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव यांच्या शिवसेनेनं महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यावरून आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं.
या प्रश्नावर आदित्य यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता उत्तर दिलं. ते झी २४ तास या वृत्तवाहिनीशी बोलत होते. ‘सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण आज महाराष्ट्राला महाविकास आघाडीची गरज आहे. निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र जो पक्ष ही निवडणूक लढतो आहे, त्यांनी अदानीवर आपली भूमिका स्पष्ट करावी. भाजपच्या इशाऱ्यावरून उद्योगधंदे महाराष्ट्रातून जे बाहेर चालले आहेत त्यावर बोलावं,’ असा अप्रत्यक्ष टोला आदित्य यांनी राज ठाकरे यांना हाणला.
वरळी विधानसभेत सत्ताधारी महायुती उमेदवाराच्या शोधात आहे. मात्र अद्यापही एखादा मोठा चेहरा मिळालेला नाही. याबाबत विचारलं असता, मोठा चेहरा म्हणजे पंतप्रधान का, असा मिश्किल प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला.
आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात झालेल्या कामांची जंत्रीच त्यांनी यावेळी केली. तब्बल २५ वर्षे रखडलेला बीडीडी चाळींचा प्रकल्प आमच्या प्रयत्नानं सुरू झाला आहे. सचिन अहिर, सुनील शिंदे, अरविंद सावंत यांच्या मदतीनं आम्ही हा प्रश्न सोडवला. आता १० हजार लोक आपल्या हक्काच्या घरात जाणार आहेत. पहिला टप्पा डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचे रखडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. घरांचा एक मोठा प्रश्न आम्ही सोडवला आहे. इतर अनेक विकासकामं झाली आहेत. काही सुरू आहेत. हीच कामं पुढं नेऊ, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या