राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील म्हणजेच पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांची एकूण संख्या २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
राज्यातील एकूण मतदारांमध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असे एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. यामध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ मतदारांमध्ये पुरुष मतदार १२ लाख ९१ हजार ८४७, ९ लाख ३० हजार ७०४ महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १५३ इतकी आहे. २० ते २९ या वयोगटातील एकूण १ कोटी ८८ लाख ४५ हजार ०५ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी १ लाख ६२ हजार ४१२, महिला मतदार ८६ लाख ८० हजार १९९ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २३९४ इतकी आहे. ३० ते ३९ या वयोगटातील एकूण २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी ११ लाख २१ हजार ५७७ , महिला मतदार १ कोटी ६ लाख ९१ हजार ५८२ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २ हजार ११९ इतकी आहे.
वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या १०० ते १०९ या वयोगटातील एकूण ४७ हजार १६९ मतदारांमध्ये पुरुष मतदार २० हजार ९८३ , महिला मतदार २६ हजार १८४ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २ आहे. ११० ते ११९ या वयोगटातील एकूण ११३ मतदारांमध्ये पुरुष मतदार ५२ तर महिला मतदारांची संख्या ६१ आहे. तर १२० हून अधिक वयोगटातील ११० मतदारांमध्ये पुरुष मतदार ५६ तर महिला मतदारांची संख्या ५४ आहे. त्याचबरोबर एकूण ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार ३ लाख ८४ हजार ६९, महिला मतदार २ लाख ५७ हजार ३१७ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३९ इतकी आहे. सेवा दलातील (सर्व्हिस व्होटर्स) एकूण १ लाख १६ हजार १७० मतदारांमध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरुष तर ३ हजार ८५२ महिला मतदार आहेत.
राज्यात मतदानासाठी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र असणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी ७ हजार ९९४ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असून २८८ मतदारसंघातील एकूण ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याचप्रमाणे ९२१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
संबंधित बातम्या