Mahayuti Oath Ceremony News: महायुती सरकारचा गुरुवारी (५ डिसेंबर २०२४) शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात मनोरंजन, क्रिडा आणि उद्योगसह विविध श्रेत्रातील मोठ्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली, जे अनेकांसठी आकर्षण ठरले. मात्र, महायुती सरकारच शपथविधी सोहळा आता भलत्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. शपथविधी सोहळ्ण्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. या सोहळ्यात चोरट्यांनी १२ लाखाचा ऐवज लंपास केला.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मोठ्या संख्येत नागरिकांनी मुंबईतील आझाद मैदानात गर्दी केली. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. मुंबई पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा तुकड्यांसह ४,००० जवानांचा फौजफाटा तैनात केल्या. कडेकोट बंदोबस्त असूनही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या मौल्यवान वस्तू गायब केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एकूण १२ लाखांचा ऐवज लंपास केला, ज्यात सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोकड यांचा समावेश आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अधिकारी एस. अहमत अली यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी आझाद मैदानात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. गेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री होते. तर, फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागा जिंकता आल्या. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिंदे गटाला ५७ जागा, अजित पवार गटला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवार गटाने १० जागेवर विजय मिळवला.
संबंधित बातम्या