रतन टाटांना मृत्युपश्चात सन्मानित करा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय प्रस्ताव पाठवला… वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रतन टाटांना मृत्युपश्चात सन्मानित करा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय प्रस्ताव पाठवला… वाचा

रतन टाटांना मृत्युपश्चात सन्मानित करा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय प्रस्ताव पाठवला… वाचा

Updated Oct 10, 2024 01:14 PM IST

Bharat Ratna for Ratan Tata : रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची केंद्र सरकारला विनंती करणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला.

रतन टाटा यांना 'भारत रत्न' पुरस्कार द्या: राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव
रतन टाटा यांना 'भारत रत्न' पुरस्कार द्या: राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव

देशातील ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. रतन टाटा यांचे कार्य लक्षात घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची केंद्र सरकारला विनंती करणारा प्रस्तावही कॅबिनेटच्या बैठकीत संमत करण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाच्या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो. मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती प्रामाणिक कळवळा हवा. उद्योगपती रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला आहे. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाज उभारणीच्या कामातही रतन टाटा यांचे योगदान अपूर्व असे होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा ठसा उमटवला होता. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे, असं शोकप्रस्तावात म्हटलं आहे.

गडचिरोलीतील तरुणांसाठी टाटांनी ‘इनोव्हेशन सेंटर’ सुरू केलं

भारतात मोटारीपासून मिठापर्यंत आणि कंप्युटरपासून कॉफीपर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले गेले आहे. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले आहे. मुंबईवर झालेल्या २६ / ११ च्या हल्ल्यानंतर रतन टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा सर्वांच्या स्मरणात कायम राहणार आहे. कोविड काळात रतन टाटा यांनी पीएम रिलीफ फंडाला तत्काळ १५०० कोटी रुपये दिले होते. कोविड काळात रुग्णांसाठी टाटा ग्रूपची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली होती. रतन टाटा यांनी राज्यात गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी ‘इनोव्हेशन सेंटर’ सुरू केले आहे.

महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योग रत्न’ पुरस्कार रतन टाटांना प्रदान

टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं. महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योग रत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदान करण्यात आला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या