Ramdas Athawale: राज्याच्या मंत्रिमंडळात आम्हालाही मंत्रिपद हवे, आठवलेंची मागणी
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ( cabinet expansion) आम्हालाही एक मंत्रीपद मिळावं, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.
मुंबई - राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार (Maharashtra cabinet expansion) लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिले आहेत. त्यानंतर आता अनेकांच्या आशा पल्लवित झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ( cabinet expansion) आम्हालाही एक मंत्रीपद मिळावं, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. दलित पँथरला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उल्हासनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
उल्हासनगरच्या रिजन्सी हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात रामदास आठवले यांच्या हस्ते दलित पँथरमध्ये लढलेल्या, शहीद झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. दलित पँथरमुळेच आम्हाला हे दिवस पाहायला मिळाले, असं म्हणत आठवले यांनी यावेळी पँथर चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला.
महागाईला काँग्रेसच जबाबदार - आठवले
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आठवले यांनी काँग्रेसच्या महागाईच्या आंदोलनावर टीका केली. काँग्रेसनं ७५ वर्षांपैकी ६०-६५ वर्ष देश चालवला, त्यामुळे आजच्या परिस्थितीला काँग्रेसच जबाबदार असून मोदी सरकारकडून देशाच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचं आठवले म्हणाले.
मंत्रिपदासाठी फडणवीसांची भेट -
राज्य सरकारमध्ये आपल्याला एका मंत्रिपदाची अपेक्षा असून आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तशी मागणी केल्याचंही आठवले यांनी सांगितलं. दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातले वाद मिटले असून पुन्हा वाद झाल्यास आपण ते वाद मिटवू, अशी भूमिका आठवले यांनी घेतली.
नवीन सरकारमध्ये एक मंत्रीपद आपल्याला मिळावं, अशी अपेक्षा आहे, असं यावेळी रामदास आठवले म्हणाले. मागच्या वेळेला आम्हाला महायुतीच्या माध्यमातून एक मंत्रीपद मिळालं होतं. यावेळेला एक मंत्रीपद मिळालं पाहिजे, यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मंत्रीपदासोबतच महामंडळाचं अध्यक्षपद, उपाध्यक्षपद, संचालकपद, सदस्यपद, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या आहेत. अशा सगळ्या कमिट्यांवर आम्हाला संधी मिळावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. आपण या मागण्यांचा नक्कीच विचार करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.