Maharashtra Cabinet Expansion News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली. नितेश राणे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ आणि इतर अनेक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेले भाजप नेते नितेश राणे यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. नितेश राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठा यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांच्या विविध सामाजिक कामे, मतदारसंघातील कामे आणि विरोधकांवर तुटून पडण्याची भाषाशैली यामुळे पक्षाने खूश होत त्यांना मंत्रिपदाची संधी दिली.
भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. या मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा विजय मिळवला. बोर्डीकर या काँग्रेसमध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली.
माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. मिसाळ या 2009 पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्या सलग 4 वेळा पर्वती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या कामांमुळे भाजप पक्षाने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिली आहे.
शिवेंद्रराजे भोसले हे २०१९ मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांना यावेळी भाजप पक्षाने मंत्रिपदाची संधी दिली. शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांची साताऱ्यात मोठी ताकद आहे.
आकाश फुंडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी सलग तीन वेळा खामगांव मतदारसंघातून विजय मिळवला आहे. यानंतर भाजपने त्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागा जिंकता आल्या. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिंदे गटाला ५७ जागा, अजित पवार गटला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवार गटाने १० जागेवर विजय मिळवला. तर, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (काँग्रेस- १३, ठाकरे गट- ९, शरद पवार गट-८) ३० जागा जिंकल्या होत्या. तर, महायुतीला १७ (भाजप-९, शिंदे गट-७, अजित पवार गट-१) जागेवर विजय मिळवता आल्या होत्या.