Ahmednagar Drowning News: अहमदनगरच्या प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. बोट उलटल्याने पाच जण पाण्यात बुडाले. त्यापैकी तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघांचा शोध सुरू आहे. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळची ही घटना आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
आकाश शिंदे, वैभव वाघ, राहुल पवार अशी मृत जवानांची नावे आहेत. अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ दोन जण प्रवरा नदीत बुडाले. त्यांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफला पाचारण करण्यात आले. एसडीआरएफच्या पथकातील चार जवान आणि एक स्थानिक व्यक्ती असे एकूण पाच जण बुडालेल्या व्यक्तीच्या शोधात नदीत उतरले. दुर्दैवाने, अचानक त्यांची बोट उलटल्याने पाचही जण नदीत बुडाले. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जणांचा शोध सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी पोहोचले. इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली. या घटनेने परिसरात शोकाकूळ वातावरण पाहायला मिळत आहे.
पुण्यातील शिरूर तालुक्यात शेततळ्यात बुडल्याने दोन सख्ख्या भावंडाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (२२ मे २०२४) दुपारी शिरूर तालुक्यातील पाबळ गावात घडली. आर्यन संतोष नवले (वय, १३) आणि आयुष संतोष नवले (वय, १०) असे अशी शेततळ्यात पडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. आर्यन आणि आयुष हे दौंड तालुक्यातील राहु येथील रहिवाशी आहेत. सुट्टीनिमित्त ते पाबळ येथील त्यांचा मामा सचिन भाऊसाहेब जाधव यांच्याकडे आले होते. या घटनेने नवले कुटुंबावर दु:खाचा कोसळला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यू नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या