Ajit Pawar : कर्नाटकच्या 'या' कृतीमुळं महाराष्ट्राला धोका; अजित पवारांनी वेधलं सरकारचं लक्ष
Ajit Pawar : कर्नाटकनं हाती घेतलेल्या कळसा भांडुरा प्रकल्पामुळं महाराष्ट्राला निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य धोक्याकडं अजित पवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे.
Ajit Pawar on Kalasa Bhandura Project : सीमेवरील गावावरून चिथावणीखोर वक्तव्य करून वाद निर्माण करणाऱ्या कर्नाटक सरकारनं आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याचा प्रयत्न चालवला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं.
माहितीच्या मुद्द्याद्वारे (Point of Information) अजित पवार यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला. महाजन आयोगाच्या शिफारशीनुसार खानापूर तालुक्यातील ३० गावांचा समावेश महाराष्ट्रात होणे अपेक्षित आहे. मात्र, महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या या प्रदेशातील पाणी धारवाडमध्ये वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाजन आयोगाचा अहवाल हाच अंतिम असल्याचं कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे. तसं असेल तर कर्नाटक सरकारनं कळसा भांडुरा प्रकल्प हाती घेणं गैर आहे. कारण, त्यामुळं खानापूर तालुक्याला, पर्यायानं महाराष्ट्राला फटका बसणार आहे. महाराष्ट्राचं पर्यावरणच यामुळं धोक्यात येणार आहे, अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केली.
'कर्नाटक सरकार भाषेच्या बाबतीत मराठी बांधवांची गळचेपी करतंच आहे. आता महाजन आयोगानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या खानापूरमधील पाणी पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वतःच्या धारवाडमध्ये वळवू पाहत आहे. महाराष्ट्र सरकारनं या विरोधात न्यायालयात धाव घेणं गरजेचं आहे, अशी आग्रही भूमिका अजित पवार यांनी मांडली.