खातेवाटप झालं नसतानाच अधिवेशनाची तारीख जाहीर! कोणता मंत्री कोणत्या खात्याची उत्तरं देणार?
Maharashtra Assembly Session एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मंत्रीमंडळ विस्ताराला तब्बल ४० दिवस लावले. १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, त्यांना खातेवाटप झाले नसताना पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर ४० दिवसांनी मंत्री मंडळ विस्तार झाला. १८ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर आता एकनाथ शिंदे सरकार हे पावसाळी अधिवेशनासाठी सज्ज झाले आहेत. १७ ऑगस्टपासून हे अधिवेशन सुरू होणार असून ते २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र, अध्याप खाते वाटप झाले नसल्याने विरोधकांच्या प्रश्नांना कोणता मंत्री कोणत्या खात्याची उत्तरे देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०२२ चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक १७ ऑगस्ट पासून मुंबईत विधान भवनात होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक २०, २१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. तर २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अधिवेशनाचा कालावधी जाहीर झाला आहे. मात्र, अद्याप खाते वाटप झाले नसल्याने विरोधकांच्या प्रश्नांना कोणता मंत्री उत्तर देईन हे अद्याप गुपित आहे. मंत्री मंडल विस्तार झाला. आता खाते वाटपाला कोणता मुहूर्त लावता असा प्रश्न विरोधक उपस्थितीत करत आहेत. दरम्यान, आज संध्याकाळ पर्यन्त खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.