बेरोजगारांना दर महिना ५ हजार रुपये भत्ता सुरू करा; राष्ट्रवादीची मागणी
Maharashtra Assembly Monsoon Session: राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी दर महिना पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.
Maharashtra Assembly Monsoon Session: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत राज्यातील बेरोजगारांच्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधलं. सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी मिळणारा बेरोजगारी भत्ता सरकारनं बंद केलेला आहे. तो पुन्हा सुरू करावा व सुशिक्षित बेरोजगारांना महिना ५ हजार रुपये भत्ता द्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली.
तारांकित प्रश्नाद्वारे खडसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यातील सेवायोजन कार्यालय (Employment Exchange) जवळपास बंद झालेले आहेत. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधून पूर्वी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायच्या, त्या आता होत नाहीत. कौशल्य विकास विभाग किंवा अन्य विभागांमार्फत बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी काही प्रक्रिया राबवली जाणार आहे का? असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला होता.
माजी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी १ लाख युवकांना नोकऱ्या मिळवून देण्याचा संकल्प राबविला होता. त्याप्रमाणे कौशल विकास विभाग काही योजना राबविणार आहे का? एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये अनेक तरुण नोंदणी करतात. पण त्यांना कुणीही रोजगारासाठी बोलवत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शासकीय कार्यालयामध्ये ज्या जागा रिक्त आहेत, त्या जागेवर कंत्राटी कामगारांच्या ऐवजी शासकीय भरती करणार आहात का? असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारला केला. तसेच खासगी कंपन्यांसाठीही काही नियम करून एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये ज्या बेरोजगारांनी नोंदणी केली आहे, त्यांना प्राधान्यानं नोकरी देणार का? शासन याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेणार आहे का? असा सवालही शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला.
बेरोजगारांच्या नोंदणीबाबत सकारात्मक विचार करू, असं कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. कौशल्य विकास विभागानं पोर्टल तयार केलं असून त्यात बेरोजगारांची नोंदणी केली जाते. तसेच विविध उद्योग-आस्थापनं देखील तिथं नोंदणी करू शकतात, असं सांगत, बेरोजगारी भत्त्याचा विषय मात्र माझ्या अखत्यारीत येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.