महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. तरीही राज्यात सर्वाधिक जागा लढविणाऱ्या भाजपला बंडखोरांची समजूत काढता आलेली नाही. ज्या जागांवर पक्षाच्या विजयाची चांगली शक्यता मानली जात आहे, त्या जागांवर मोठ्या संख्येने बंडखोर निवडणूक लढवत आहेत, यामुळे पक्षासाठी डोकेदुखी झाली आहे. बंडखोरी करणाऱ्यांमध्ये अनेक नेते असे आहेत ज्यांचे तिकीट कापून दुसऱ्या कुणाला तरी दिले आहे किंवा जागाच युती पक्षाच्या खात्यात गेली आहे. शायना एनसी यांचे प्रकरण सर्वात मनोरंजक आहे, तिकिटासाठी त्या एकनाथ शिंदे गटात सामील झाल्या असून त्या मुंबादेवीमधून उमेदवार आहेत.
मुंबादेवीबरोबरच अकोला पश्चिम, बोरिवली सारख्या जागांवरही भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत बोरिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीच्या आशेवर असलेल्या गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी केली आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत, तर पक्षाने येथून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. शेट्टी यांची समजूत काढण्यासाठी ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी सोमवारी रात्री बैठक घेतली होती, मात्र शेट्टी लढण्यावर ठाम आहेत. तर शायना एनसी यांनी निवडणूक लढण्यासाठी पक्ष बदलला आहे. त्या मित्रपक्ष शिवसेनेत गेल्या असून एकनाथ शिंदे गटानेही त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी वरळी मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होत्या. पण भाजपने ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिली. शेवटी शायना एनसी यांनी त्याच शिवसेनेत प्रवेश करत मुंबा देवी मतदारसंघातून तिकीट मिळवले आहे. काँग्रेसच्या अमीन पटेल यांच्याविरोधात त्या निवडणूक लढवणार आहेत. आता विशेष म्हणजे भाजपचे अतुल शहा अपक्ष उमेदवार म्हणून या जागेवर निवडणूक लढवणार आहे. शायना एनसीला येथून उमेदवारी देणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही जागा भाजपच्या खात्यात राहिली पाहिजे. आता शहा यांच्या बंडखोरीमुळे महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे.
वांद्रे पूर्व मतदारसंघातही भाजपसमोरील आव्हान वाढले आहे. अजित पवार गटाने झिशान सिद्दीकी यांना तर शिवसेनेच्या शिंदे गटाने कुणाल सरमळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे युतीचे दोन पक्षच येथे आमने-सामने आले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते हरीश अलीमचंदानी यांनी अकोला पश्चिममधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघातून भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपच्या भवितव्यावर परिणाम होणार आहे.
बडनेरा मतदारसंघात भाजपचे तुषार भारतीय इच्छुक होते. पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली आहे. यामुळे तुषार भारतीय अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिल्याने तुषार भारतीय नाराज झाले आहेत. आता बडनेरा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार रवी राणा असणार आहेत.
संबंधित बातम्या