Maharashtra Assembly Election 2024: शिंदेंच्या शिवेसेनेतील विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी पालघर विधानसभेतून राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली. याबाबत श्रीनिवास वनगा यांनी पत्रकारपरिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. यानंतर श्रीनिवास वनगा हे सोमवारी संध्याकाळी कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेले. गेले ३६ तास त्यांचे दोन्ही मोबाईल नॉट रिचेबल होते. आता त्यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
शिंदे गटाने पालघरमधून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना तिकीट नाकारले आणि त्यांच्या जागी माजी लोकसभा सदस्य राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. यामुळे वनगा हे दुखावले. यानंतर त्यांनी सोमवारी संध्याकाळी घर सोडले. मात्र, अनेक तास उलटूनही ते घरी पतरले नाहीत. वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. कुटुंबातील लोकांनी वनगा यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे दोन्ही फोन नॉट रिचेबल होते.त्यामुळे वनगा यांचे कुटुंबीय चिंतेत होते. अखेर मंगळवारी रात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान श्रीनिवास वनगा घरी परतले, अशी माहिती समोर आली. यामुळे त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सोमवारी संध्याकाळपासून घराबाहेर पडलेले श्रीनिवास वनगा हे आपल्या एका मित्राच्या घरी होते. त्यावेळी ते नाराज असल्यामुळे त्यांनी आपला फोन बंद ठेवला होता. परंतु, शांत झाल्यानंतर ते पुन्हा घरी पतरले, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली. परंतु, श्रीनिवास वनगा नेमके कोणत्या ठिकाणी होते? याबाबत त्यांच्या कुटुंबाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे श्रीनिवास वनगा विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, ही बाब स्पष्ट झाली आहे. परंतु, श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभुराज देसाई त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला. श्रीनिवास वनगा यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात येईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी वनगा यांच्या पत्नीला दिल्याचे समजते.
शिवसेनेशी बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे यांना श्रीनिवास वनगा यांनी साथ दिली. यामुळे आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, शिंदे गटाने पालघर विधानसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांचे नाव जाहीर केली. यानंतर श्रीनिवास वनगा यांनी पत्रकारपरिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. 'ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते, मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला', असेही ते म्हणाले.
संबंधित बातम्या