Refinery Project: रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक; चर्चेसाठी आलेल्या निलेश राणेंचा काढता पाय
Refinery Project In Ratnagiri : रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पावरून आता पुन्हा वाद उफाळला आहे. प्रकल्पासाठी जमिन आणि मातीचं सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकारी आणि स्थानिकांमध्ये वाद झाल्यानंतर आता भाजप नेते निलेश राणेंनी स्थानिकांशी चर्चा केली आहे.
Refinery Project In Ratnagiri : कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यानंतर आता हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातल्या बारसू गावात उभारण्यात येणार आहे. परंतु या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी अधिकाऱ्यांनी या बारसू गावातील जमिनीचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानं स्थानिक शेतकरी चांगलेच संतापले होते, त्यानंतर स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी स्थानिकांची भेट घेतली आहे.
स्थानिक शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची...
बारसू गावात रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी काल काही अधिकारी बारसू गावात आले असता स्थानिकांनी सर्वेक्षणाला विरोध केला, त्यामुळं बारसू गावात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याशिवाय सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्या पोलिसही आल्यानं पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. त्यानंतर त्यात एक महिला जखमी झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता.
भाजप नेते निलेश राणेंनी घेतली गावकऱ्यांची भेट...
राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा रिफायनरी प्रकल्पाला वाढता विरोध पाहता भाजप नेते निलेश राणे यांनी गावकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे. स्थानिकांशी भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काही लोक या प्रकल्पाला विरोध करायचा म्हणून करत आहे, ज्या शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील त्यांनी त्या सरकारसमोर मांडायला हव्यात, हा प्रकल्प कोकणाच्या विकासासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय स्थानिकांनी हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी सरकारकडे निलेश राणेंनी करायला हवी, अशी मागणी केली आहे. त्यामुळं आता कोकणात पुन्हा रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वादंग पेटलं आहे.
आजही सरकारी अधिकारी या प्रकल्पाच्या जमिनीचं सर्वेक्षण करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता पुन्हा स्थानिक शेतकरी या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी विरोध करण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तात हे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.