Maharashtra Assembly Election 2024: सत्ताधारी महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना आलेल्या तिकिटावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीला आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणे आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील अणुशक्ती नगरचे विद्यमान आमदार नवाब मलिक मानखुर्द-शिवाजी नगरमधून निवडणूक लढवतील आणि आपली मुलगी सना यांच्यासाठी अणुशक्ती नगर मतदारसंघ सोडतील, या वृत्तावर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले की, आम्ही नवाब मलिक यांना पाठिंबा देणार नाही आणि वेगळी भूमिका घेऊ. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणे आम्हाला मान्य नाही.
नवाब मलिक महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. दाऊद आणि छोटा शकील आणि टायगर मेमनसह त्याच्या इतर साथीदारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने मलिक यांना २०२२ मध्ये अटक केली. मलिक यांना यावर्षी जुलैमध्ये वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर मित्रपक्ष भाजपचा आक्षेप असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने आमदार मलिक यांना आपल्या पक्षात घेतले.
२८८ सदस्यांच्या विधानसभेत १२५ जागा मिळवण्यासाठी भाजप १५० जागा लढवण्याचा विचार करत आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपने आशिष शेलार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. तर त्यांचे बंधू विनोद शेलार मालाड पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने ९९ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह ७१ आमदार कायम ठेवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सर्व विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम ठेवणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार नवाब मलिक यांची उमेदवारी निश्चित असून त्याला शेलार यांच्याकडून विरोध केला जात आहे.
महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत आहे. नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले. पण आगामी विधानसभेत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
संबंधित बातम्या