मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “महाराष्ट्रातील साडे तेरा कोटी जनतेचा विश्वास पवारांवर की फडणवीसांवर? एकदा होऊन जाऊ द्या सर्व्हे"

“महाराष्ट्रातील साडे तेरा कोटी जनतेचा विश्वास पवारांवर की फडणवीसांवर? एकदा होऊन जाऊ द्या सर्व्हे"

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 14, 2023 11:08 PM IST

Peopletrust sharad pawarorfadnavis : भाजपच्या मिशन महाविजय संयोजक श्रीकांत भारतीय यांनी मोठे विधान करत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास शरद पवारांवर आहे की, देवेंद्र फडणवीस याचा एका सर्वे व्हायलाच हवा.

पवार व फडणवीस
पवार व फडणवीस

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या महाविजय मोहिमेची जबाबदारी असलेल्या व देवेंद्र फडणवीस यांचे खास समर्थक म्हणून ओळख असलेल्या श्रीकांत भारतीय यांनी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रातील साडे तेरा कोटी जनतेचा विश्वास शरद पवारांवर आहे की फडणवीसांच्या शब्दावर आहे, याचा सर्व्हे एकदा व्हायलाच हवा. त्यानंतरच कळेल की महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे? असे आव्हान भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले आहे.

शरद पवारांवर त्यांच्या घरातील लोकांचाही विश्वास राहिलेला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. भाजपच्या मिशन महाविजय संयोजकपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार श्रीकांत भारतीय मंगळवारी  सोलापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. जनतेला नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्वास आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही जनतेने फडणवीसांवर विश्वास दाखवून युतीला बहुमत दिले होते. मात्र गद्दारी करून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. आत्ताची युती नैसर्गिक असून हे जनतेच्या मनातील सरकार आहे. 

आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी पक्षाने रणनिती आखली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यावेळीची परिस्थिती पाहून उमेदवारी देण्यात येईल. पक्षाकडून मतदारसंघातील नेत्यांच्या कामांची माहिती घेतली जाते. भाजपच्या कॅटेगिरीत बसणाऱ्या उमेदवाराला संधी मिळते, असेही ते म्हणाले.

WhatsApp channel