Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करून महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. लाडकी बहीण योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरली व महिलांच्या मतांच्या जोरावर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. निवडणुकीनंतर कसाबसा एक हल्ला महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे. या छाननीत अनेक अर्ज बाद ठरण्याची शक्यता आहे. काही महिलांनी स्वत:हून आपले अर्ज मागे घ्यायला सुरूवात केली आहे. त्यातच अपात्र महिलांना आता योजनेचे १५०० रुपये बंद होणार असल्याची माहिती असून अशा महिलांना याआधी दिलेला ९००० हजार रुपयांचा लाभही परत घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे, यावर महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिला अर्जदारांचे याआधी दिलेले पैसे परत घेतले जाणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अपात्र महिला अर्जदारांना यापुढे १५०० रुपयांचा लाभ दिला जाणार नाही, मात्र याआधी दिलेले पैसे त्यांच्याकडून परत घेतले जाणार नसल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. यामुळे अपात्र महिला अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अदिती तटकरे म्हणाल्या की, सरकार किंवा प्रशासनाने कोणत्याही बहिणीला कागदपत्रे मागितली नाहीत व व्हेरिफिकेशनसाठी त्यांच्या घरी गेलो नाही. ज्या भागातून तक्रारी आल्या तिथेच फेरतपासणी झाली आहे. कुठेही सरसकट अर्जांची छाननी केलेली नाही.
ज्या लाडक्या बहिणी फेरतपासणीत अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाहीत. त्यांचे अर्ज बाद होतील. त्यांना या पुढच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. अनेक महिलांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज भरले होते. काही महिलांचे अर्ज पहिल्या दोन टप्प्यातले होते. प्रत्येक सरकारी योजनेत दोन तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी स्क्रूटिनी होत असते. त्यामुळे ही गोष्ट काही नवीन नाही.
ज्या महिला अपात्र ठरल्या त्यांच्याकडून कोणतीही रक्कम वसूल केली जाणार नाही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यांचे अर्ज बाद केले जातील. त्यांना या पुढच्या योजनांचा लाभ मिळणार नाही असं आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शासनानं कोणताही लाभ परत घेतला नाही. जे पैसे महिलांनी परत केले आहेत ते स्वत:च्या मर्जनं केले आहेत. ज्या ज्या महिलांनी योजना नको असे अर्ज दिले आहेत. त्याची स्क्रूटिनी सुरू आहे. त्यामुळे त्या फेरतपासणीनंतरच पुढचे पाऊल उचललं जाईल.
संबंधित बातम्या