Kurla BEST Bus Accident : कुर्ला येथे सोमवारी झालेल्या बेस्ट अपघातातील मृत्युमुखींची संख्या वाढली आहे. या घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४९ जण जखमी झाले आहेत. भरधाव बेस्ट चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी चालक संजय मोरे याला अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.
काल सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास बेस्ट बस रूट क्र.३३२ कुर्ला स्थानक येथून भरधाव वेगात अंधेरीकडे जात होती. यावेळी गडीत तब्बल ६० प्रवासी होते. यावेळी भरधाव बसने रस्त्यावरील वाहतांना व नागरिकांना धडक दिली. या भीषण अपघातामुळे कुर्ला परिसरात गोंधळ उडाला. अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा दवाखान्यात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. नागरिकांनी बस चालक संजय मोर याला पकडून चोप दिला. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेत त्याला नगरिकांच्या तावडीतून सोडवले. दरम्यान, आज घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून तपास सुरू करण्यात आला आहे. तर कुर्ला बस स्थानक आज बंद ठेवण्यात आले आहे.
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील चालक संजय मोरे याला मोठे वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याची माहिती समोर आली आहे. मोरे हा बेस्टमध्ये १ डिसेंबर रोजी चालक म्हणून भरती झाला होता. यापूर्वी तो दुसऱ्या ठिकाणी कामाला होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याला, या पूर्वी त्याने कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे त्याला वाहन चालवण्याचा अनुभव नसताना मोठी बस चालवायला कुणी डेली हा सवाल आता उपस्थित होत आहे. संजय मोरे हा घाटकोपरच्या असल्फा येथे राहत असून लॉकडाऊननंतर तो बेस्टमध्ये कंत्राटी तत्वावर कामाला लागला. अपघातग्रस्त इलेक्ट्रीक बस त्याने १० दिवसांपूर्वी चालवयला सुरवात केली होती. ही बस कशी चालवायची याचे ट्रेनिंग देखील त्याला नव्हते.
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. प्राथमिक माहितीनुसार, बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, तपासात वेगळी माहिती समोर येऊ लागली आहे.
संबंधित बातम्या