Kolhapur Accident: कोल्हापुरातील सायबर चौकात आज दुपारी भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी २.२५ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. एका हुंडाई सॅन्ट्रो कारने सायबर चौकात चार दुचाकींना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कार चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, इतर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सीटी हॉस्पिटल आणि सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
कोल्हापुरातील सायबर चौकात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. राजारामपुरी आणि शिवाजी विद्यापीठ, राजाराम कॉलेजला जोडणाऱ्या या चौकात दिवसा मोठी गर्दी असते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, चौकात वाहने हळहळे पुढे जात आहेत. मात्र, काहीच क्षणात भरधाव वेगात आलेली कार समोरील वाहनांना जोरात धडकून पुढे जाऊन पलटी होते. त्यावेळी दुचाकीवरील दोन-तीन जण हवेत उडल्याचे दिसतात.
समृद्धी महामार्गावर सोमवारी सकाळी कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवर भरधाव कारने रस्त्यात उभा असलेल्या ट्रकला धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर कारमधील मृतदेह काढून मालेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात कारचा अशरक्ष: चक्काचूर झाला. समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. हा मार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात असतानाही अपघाताच्या घटना थांबायचे नाव घेईना.
संबंधित बातम्या