Nitesh Rane News : ‘केरळ राज्य हे मिनी पाकिस्तान आहे. त्यामुळंच राहुल गांधी तिथं निवडून येतात आणि आता त्यांची बहीण प्रियांका गांधी निवडून आल्या,’ असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री नीतेश राणे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं वाद उफाळून आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करून मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानिमित्त पुण्यातील सासवड इथं आयोजित सोहळ्यात नीतेश राणे बोलत होते. त्यावेळी ते बोलता-बोलता केरळ आणि राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यावर घसरले.
‘केरळ हे मिनी पाकिस्तानपेक्षा कमी नाही. म्हणूनच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी तिथून निवडून येतात. सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. मी सत्य बोलतोय. हे लोक अतिरेक्यांच्या पाठिंब्यामुळंच खासदार होतात,’ असं नीतेश राणे म्हणाले.
केरळमधून कार्यक्रमाला आलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचंं त्यांनी यावेळी कौतुक केलं. 'आपल्या एका बहिणीला घरी आणण्यासाठी किती कष्ट करावे लागतात ते आमच्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला विचारा. पण केरळमधल्या एका भावानं १२ हजार हिंदू भगिनींचं आयुष्य वाचवून दाखवलं. केरळसारख्या राज्यात त्यांनी हे केलं, असं नीतेश राणे यावेळी म्हणाले.
‘हिंदूंच्या सण-उत्सवातील मिरवणुका जर रात्री दहा वाजेपर्यंत चालत असतील तर मोहर्रमच्या आणि ईदच्या मिरवणुकादेखील दहा वाजेपर्यंतच चालल्या पाहिजेत, असं राणे म्हणाले. 'आपण बोलणारे कमी आणि कार्यक्रम करणारे जास्त आहोत. तुमच्या हक्काचा माणूस सरकारमध्ये बसलाय फक्त एक फोन करा. बेकायदेशीर कामं करणाऱ्यांना कसं थरथर कापावं लागतं ते कळेल, असा इशारा नीतेश राणे यांनी दिला.
देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षानं स्पष्ट करावं, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. अशा माणसाला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, असं लोंढे यांनी म्हटलं आहे.
नीतेश राणे यांच्या वक्तव्याचा काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. 'नीतेश राणे हे सतत मुस्लिमांच्या विरोधात बोलतात. पण त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. मंत्री झालेली व्यक्ती जेव्हा असं काही बोलते तेव्हा ते मुख्यमंत्र्यांचं विधान मानलं जायला हवं. मुख्यमंत्री त्यांना वेसण घालू शकत नाहीत का? केरळ हे एक गौरवशाली आणि उच्च शिक्षित राज्य आहे आणि हा माणूस या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणतो एवढी याची हिंमत होते, असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते माजिद मेमन यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या