Kalicharan Maharaj : कालीचरण महाराज पुन्हा बरळले, महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...
Kalicharan Maharaj : महात्मा गांधी यांच्याबद्दल पुन्हा बेताल वक्तव्य केल्यामुळं आता कालीचरण महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Kalicharan Maharaj Controversial Statement On Mahatma Gandhi : स्वातंत्र्य संग्रामातील नेत्यांवर सातत्यानं वादग्रस्त वक्तव्ये करणारे अकोल्याचे कालीचरण महाराज यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटलं असून त्यावर महाराष्ट्रात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. नाथुराम गोडसे यांना जेवढं वाचाल तेवढं तुम्ही त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. नाथुराम गोडसे यांनी जे केले ते योग्यच होतं, असं म्हणत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचं खुल समर्थन केलं आहे. त्यामुळं आता कालीचरण महाराजांच्या नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळं महाराष्ट्रात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज?
एका कार्यक्रमात बोलताना कालीचरण महाराज म्हणाले की, तुम्ही नाथुराम गोडसे यांना जेवढं वाचाल तेवढं त्यांचे भक्त व्हाल आणि महात्मा गांधींचे विरोधक व्हाल. नाथुराम गोडसे यांनी जे केलं ते योग्यच होतं. नाथुराम गोडसे नसते तर हिंदू धर्म बुडाला असता, असं म्हणत कालीचरण महाराज यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यापूर्वी कालीचरण महाराज यांनी छत्तीसगडच्या रायपुरमधील धर्मसभेत बोलताना महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
कालीचरण महाराज यांनी यापूर्वी देखील अनेकदा महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्ये केलेली आहेत. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात त्यांना तब्बल ९५ दिवस तुरुंगात रहावं लागलं होतं. परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. कालीचरण महाराज यांचं मूळ नाव अभिजीत सराग असून ते अकोल्यातील पंचबंगला परिसरात राहतात. सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झालेला असून त्यांच्या वडिलांचं औषधांचं दुकान आहे.