Jitendra Awhad On Prabhu Ram : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. ते शिर्डी येथील पक्षाच्या शीबीरात बोलत होते. त्यांच्या विधानामुळे नवा वाद सुरू झाला आहे. आव्हाड म्हणाले की, राम आमच्या बहुजनांचा आहे. राम शिकार करत होते व मांसाहार करत होते. त्यामुळे आम्हीही मांसाहारी आहोत. मात्र तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवण्याचा प्रयत्न करत आहात. त्यांच्या या विधानावर रोहित पवार यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त करत त्यांना घरचा आहेर दिला आहे. राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं आता सोडल पाहिजे. देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना आहे, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शिबिर सुरू होते. यावेळी आव्हाड यांनी वरील वादग्रस्त विधान केले. आव्हाड म्हणाले, राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जात असतो.
त्यांच्या या विधानामुळे आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यात अजित पवार गट आक्रमक झाला असून त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर महाआरती करणाचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तर, भाजप आमदार राम कदम आज गुरुवारी आव्हाडांविरोधात पोलीस तक्रार करणार आहेत.
दरम्यान, वाद वाढू लागल्यावर देखील आव्हाड यांनी त्यांच्या व्यक्तव्याचे समर्थ केले. भाषणानंतर माध्यमांशी बोलतानाआव्हाड म्हणाले की, मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनवले जात आहे. मात्र वनवासात काय रामाने मेथीची भाजी खाल्ली असेल का? देशात ८० टक्के लोक मांसाहारी आहेत व ते राम भक्त आहेत, असेही आव्हाड म्हणाले.
आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर रोहित पवार यांनी त्यांना सुनावले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे.
देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे, असे रोहित पवार यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
संबंधित बातम्या