Jitendra Awhad on Mahaargogya shibir : राज्यात आषाढी पंढरपूर वारीसाठी लाखो वारकरी हे पंढरपूरला पायी जात असतात. तब्बल महिनाभर हा सोहळा सुरू असतो. या सोहळ्यात प्रवासादरम्यान, वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी सरकारतर्फे महाआरोग्य शिबिर आयोजित केले जाणार आहे. मात्र, या आरोग्य शिबिरावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. एक्सवर या आरोग्य शिबिरासाठी होणारा खर्च मांडत विठ्ठलाच्या नावाने सरकार दरोडा टाकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे शिबिर वारकऱ्यांसाठी नसून कंत्राटदारांची घरे भरण्यासाठी आहे असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्टची सुरुवात ओवींनी केली आहे. यात त्यांनी
विठ्ठलाच्या नावाने दरोडा
दे देते भगवान को धोका
इन्सान को क्या छोडेंगे, असे म्हणत सरकारने या आरोग्य शिबिरासाठी केलेला खर्च मांडत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी रकारवर महाघोटाळ्याचा आरोप केला असून सरकार या आरोपांवर काय उत्तर देणार याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी लिहिल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिरे आय़ोजित करण्यात आली आहेत. वाकऱ्यांसाठी २ कोटी ४० लाखांची औषधे खरेदी केली जाणार आहेत . तर आरोग्य शिबीरात तपासणी करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली कंत्राटदारांचे घर भरण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंढरपूर येथे आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून दरवर्षी दहा लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखाल होत असतात. त्यांच्यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, गेल्या वर्षापासून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात महाआरोग्य शिबिराचे आय़ोजन केले जाते. त्यासाठी राज्य शासन आर्थिक तरतूद करतो. यंदा तीन ठिकाणी आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. त्यासाठी ९ कोटी ४४ लाखांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये २ कोटी ४० लाख रुपयांच्या औषधींचे वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तैनात ४ हजार ३२० मनुष्यबळाच्या जेवणाचा खर्च तब्बल तीन कोटी रुपये केला जाणार आहे. जो इतर खर्चाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे महाआरोग्य शिबिर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे की कंत्राटदारांच्या भल्यासाठी, असा प्रश्न आव्हाड यांनी पोस्टच्या माध्यमातून केला आहे.
महाआरोग्य शिबिरासाठी मंडप, सीसीटीव्ही, साहित्य, वाहतूक यासाठी एकूण ९ कोटी ४४ लाख रुपये खर्च राज्य सरकारने मंजूर केला आहे. तीन ठिकाणी तीन दिवसांसाठी हे आरोग्य शिबिर होणार आहे. तेथे वारकऱ्यांना मोफत उपचार व औषधी पुरविली जाणार आहे. त्यासाठीच्या खर्चाला राज्य सरकारचे अवर सचिव अ. भि. मोरे यांनी मंजुरी दिली आहे. यात एकूण खर्च 9 कोटी 40 होणार असून, वारकऱ्यांच्या वाट्याला मात्र केवळ २ कोटी ४० लाखांची औषधी येणार आहेत. उर्वरित ७ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
महाआरोग्य शिबिर तीन ठिकाणी होणार असून, ते तीन दिवस असते. त्यापैकी पहिले महाआरोग्य शिबिर वाखरीत, दुसरे तीन रस्ता आणि तिसरे गोपाळपूर येथे असेल. यासाठी आरोग्य विभागाकडून विशेषज्ञ डॉक्टर, फिजिशियन, फार्मासिस्ट, असे मिळून प्रत्येक शिबिरासाठी १४४० आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या तीन दिवसांच्या खानपानासाठी तब्बल ३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजे औषधे २ कोटी ४० लाखांची आणि खानपान ३ कोटींचा.
मंडप - ९० लाख, बैठक व्यवस्था फर्निचर खुर्ची - १२ लाख, स्वच्छतागृह व्यवस्था-१५ लाख, डॉक्टर नर्सेस अल्पोपहार व भोजन खर्च-३ कोटी, जागा भाडे खर्च - ६ लाख, सीसीटीव्ही डिजिटल स्क्रीन - १५ लाख, निवास व्यवस्था - १ कोटी ८० लाख, सतरा ठिकाणी उपचार केंद्रांचा खर्च - २० लाख, आकस्मिक खर्च केसपेपर इंटरनेट वॉकीटॉकी - ३५ लाख, वीज कनेक्शन वीज बिल- ६ लाख, वाहतूक व्यवस्था अन् इंधन खर्च - १० लाख, आरोग्य दूत इंधन खर्च - १० लाख, औषध व औषधी साहित्य सामग्री - २ काेटी ४० लाख, एकूण खर्च - ९ कोटी ४४ लाख.
संबंधित बातम्या