कावड यात्रेत तलवार नाचवल्याप्रकरणी शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कावड यात्रेत तलवार फिरवून दहशत माजवल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्या विरोधात हिंगोलीतील कळमनुरी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्रास्त्रबंदी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी हिंगोलीच्या कळमनुरी येथील चिंचाळेश्वर मंदिरातून हिंगोली येथील महादेव मंदिरापर्यंत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. या कावड यात्रेत त्यांनी बेकायदा पद्धतीने तलवार फिरवून कावड यात्रेतील भाविकांना दाखवली होती. याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी आमदार संतोष बांगर व कावड यात्रेतील डी. जे. चालकावर कळमनुरी पोलिसांत गुन्हा नोद करण्यात आला आहे. या कावड यात्रेत हिंगोली ते कळमनुरी मार्गावर बांगर यांनी हातात तलवार घेवून हवेत वार केले. दरम्यान, मी मुख्यमंत्री झालो तर मला आवडेल, असं विधानही आमदार संतोष बांगर यांनी केलं. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात आमची सत्ता आली, तर सर्वांना भगव्या टोप्या देईल, असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे कदाचित मी मुख्यमंत्री झालो, तर सर्व पोलिसांना भगव्या टोप्या देईन, असं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.
यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला अतिशय आनंद होईल, माणसाने महत्वाकांक्षी असावं, स्वप्न पाहावीत. महाराष्ट्राची आजची परिस्थिती पाहता, स्वप्न सत्यात उतरतील हे महाराष्ट्रात शक्य झालंय. मग, संतोष बांगर स्वप्न बघत असेल तर त्यात वाईट काय. मला आनंद हा आहे की, आमच्यातील एक वंजारी स्वप्न बघतोय. स्वप्न सत्यात उतरेल की नाही, हे नंतर समजेल पण स्वप्न तरी बघतोय, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतोष बांगर यांच्या विधानाचं समर्थन केलंय.
संबंधित बातम्या