Jitendra Awhad : ‘द केरला स्टोरी’ तयार करणाऱ्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी द्या, जितेंद्र आव्हाड यांची मागणी
Jitendra Awhad On The Kerala Story : केरला स्टोरीच्या माध्यमातून प्रपोगंडा पसरवला जात असल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिग्दर्शकाला भरचौकात फाशी देण्याची मागणी केली आहे.
Jitendra Awhad On The Kerala Story : केरळमधील ३२ हजार हिंदू तरुणींचं धर्मांतर करून त्यांच्यासोबत लव्ह जिहाद झाल्याचा दावा करत दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी द केरला स्टोरी चित्रपट तयार केला आहे. त्यावरून केरळसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये राजकीय वादंग पेटलं आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये केरला स्टोरीच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केरला स्टोरीच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी देण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला ३२ हजार महिलांची कथा सांगणारा चित्रपट फक्त तीन महिलांच्या कथेवर कसा आला?, असाही सवाल आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ शेयर करत म्हटलं आहे की, केरला स्टोरीच्या माध्यमातून काल्पनिक चित्र उभं करून समाजात प्रपोगंडा राबवण्यात येत आहे. देशातील सर्वात समृद्ध राज्य असलेल्या केरळाची या चित्रपटातून बदनामी करण्यात आली आहे. तसेच हिंदू भगिनी मूर्ख असून त्यांना काही समजतच नाही, असं चित्र निर्माण केलं जात आहे. त्यामुळं प्रपोगंडा राबवण्यासाठी काल्पनिक चित्र तयार करणाऱ्या द केरला स्टोरीच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. केरळची सत्य परिस्थिती वेगळी आहे. असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जात असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील ३६ टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी २.३६ लाख कोटी रुपये भारतात पाठवले, त्यामुळं अशा राज्याची केरला स्टोरी चित्रपटाच्या माध्यमातून बदनामी करणं योग्य नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.