जालन्यात काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी विजयी गुलाल उधळला आहे. कल्याण काळे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव केला.
जालना (Jalna Lok Sabha constituency) ३० वर्षांपासून भाजपचा गड होता. पण आज कॉंग्रेसच्या कल्याण काळे यांनी या गडाला सुरूंग लावला. काळे ९० हजारांहून अधिकच्या फरकाने विजयी झाले. कल्याण काळे यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष केला. तर दानवेंचे कार्यकर्ते कमालीचे निराश झालेले दिसले.
दरम्यान, कल्याण काळे यांनी २००९ च्या लोकसभा निवडणूकीतही दानवे यांच्याविरोधात लोकसभा लढली होती. पण त्यावेळी त्यांचा ८ हजार मतांनी पराभव झाला होता. यानंतर २०१४ च्या निवडणूकीत मोदी लाटेत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा २ लाख ६ हजार ७९८ मतांनी पराभव केला होता.
रावसाहेब दानवे हे १९९९ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव करीत लोकसभा गाठली होती. त्यानंतर सलग ५ वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. खासदार होण्यापूर्वी ते दोन वेळा भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.
छत्रपती संभाजीनगरची निवडणूकही चांगलीच चुरशीची झाली. संभाजीनगरात तिरंगी लढत झाली. पण या लढाईत महायुतीचे उमेदवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संदिपान भुमरे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांना १ लाख मतांच्या फरकाने पराभव केला. तर दुसरीकेड चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या स्थानी राहिले आहेत.
संबंधित बातम्या