जळगावमधील रामदेववाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात आईसह तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. भरधाव कारनं दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आई आणि ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी रास्ता रोको करत दगडफेकही केली. यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातामध्ये तीन बालकांसह महिलेचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील महिला आणि तिच्या दोन बालकांसह एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. मृत चारही जण एकाच कुटुंबातील आणि रामदेववाडी गावातील रहिवासी होते.
अपघात इतका भीषण होता की आलिशान कारच्या धडकेनंतर दुचाकीचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर ग्रामस्थांनी दगडफेक आणि रास्तारोको करत जळगाव पाचोरा रस्त्यावरील वाहतूक अडवून ठेवली. यात पोलीस कर्मचारीही जखमी झाले. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.
राणी सरदार चव्हाण (३०), सोमेश सरदार चव्हाण (२), सोहन सरदार चव्हाण (७), आणि लक्ष्मण भास्कर राठोड (१२ सर्व रा. रामदेववाडी, जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटूंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवते. मंगळवारी ( ७ मे) रोजी राणी चव्हाण या दोन्ही मुले सोहन व सोमेश चव्हाण आणि लक्ष्मण भास्कर राठोड (१२) यांच्यासह जळगावकडे कामानिमित्त चालल्या होत्या. गावाच्या बाहेर आल्यावर समोरून आलेल्या भरधाव कारने (एम एच १९ सी.व्ही. ६७६७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिन्ही मुले एका बाजूला फेकले गेले. त्यात राणी चव्हाण व सोमेश या रस्त्यावर आपटून जागीच ठार झाले. त्यासह डोक्याला मार लागल्याने सोहन याचादेखील मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच नागरिकांना घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे ४ तास राणी चव्हाण व सोमेश यांचा मृतदेह घटनास्थळीच होता. घटनास्थळी जमावाने दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन प्लाटून बोलावल्या. त्यानंतर काही वेळाने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणून जमावाला शांत करण्यात यश मिळाले.