Jalgaon Accident News: मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट चालकाने रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना नुकतीच घडली. या अपघात ७ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. यातच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात आज सकाळी एका बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस इलेक्ट्रिक खांब्याला धडकली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस लाडली गावात मुक्कामी होती आणि आज सकाळी शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीच्या दिशेने निघाली. परंतु, दोन गावाजवळील स्मशानभूमीच्या वळणाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस इलेक्ट्रिक खांबाला धडकली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण २८ जण किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोनगाव लाडली, दोनगाव आणि रेल गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी त्वरीत जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रवाशांच्या नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले. अशोक जगन्नाथ पाटील असे बस चालकाचे नाव आहे. ही इलेक्ट्रीक खांबाला धडकली नसते तर, ती समोरील नाल्यात पडली असते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
देशात गेल्यावर्षी १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर, ४ लाख ६३ हजार लोक जखमी झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. देशात दर तीन मिनिटाला एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासह एकूण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये वाढ रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे, यात उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा यांसारख्या राज्याचा समावेश आहे.
देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद तामिळनाडूत (१८ हजार ३४७) करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २०२३ मध्ये १५ हजार ३६६ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. तर, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १३ हजार ७९८ आणि १२ हजार ३२१ हजार मृत्युची नोंद झाली. तामिळनाडूत जखमींची (७२ हजार २९२) संख्या मोठी आहे.
संबंधित बातम्या