मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईच्या किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट, पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय; नौदलाकडून अलर्ट जारी

मुंबईच्या किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट, पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय; नौदलाकडून अलर्ट जारी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 01, 2023 03:44 PM IST

suspicious boat in arebian sea : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून ५० नॉटिकल मील अंतरावर एक संशयास्पद बोट आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

suspicious boat in mumbai sea
suspicious boat in mumbai sea (HT)

suspicious boat in mumbai sea : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद विदेशी बोट आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता मुंबई पोलीस आणि नौदलाकडून शहरात अलर्ट जारी करण्यात आला असून समुद्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. रायगडच्या किनारी भागात ही बोट आढळून आली असून त्यात दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर येत आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. त्यानंतर आता मुंबईसह किनारी भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगडच्या किनारी भागात एक संशयास्पद बोट फिरत असल्याची माहिती जॉईंट ऑपरेशन सेंटर या संस्थेनं दिल्यानंतर तपास यंत्रणांनी बोटीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. संशयास्पद बोट कोणत्या देशातून आली आहे अथवा कुठे जात होती, याची माहिती मिळालेली नाही. परंतु या संशयास्पद बोटीत दोन पाकिस्तानी नागरिक असल्याचं जॉईंट ऑपरेशन सेंटरने सांगितलं आहे. या घटनेमुळं मुंबईत खळबळ उडाली असून बोटीचा शोध घेतला जात आहे. संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या किनारपट्टीजवळील एका लाईट हाऊसनजीक संशयास्पद बोट आढळून आली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलीस, सागरी पोलीस, तटरक्षक दल आणि नौदलाकडून संशयास्पद बोटीचा शोध घेण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.

काही महिन्यांपूर्वीच मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर दोन विदेशी बोटी आढळून आल्या होत्या. त्यातून एके ४७ आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं होतं. ही बोट युरोपहून भारताच्या दिशेनं आल्याचा खुलासा तपासात झाला होता. परंतु आता मुंबईच्या किनारी भागांमध्ये आणखी एक विदेशी बोट आढळून आल्यामुळं महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. २६ नोव्हेंबर २००८ साली पाकिस्तानी अतिरेक्यांनी समुद्रामार्गे भारतात प्रवेश करत मुंबईत अतिरेकी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं आता या संशयास्पद बोटीचं प्रकरण तपास यंत्रणांनी गांभीर्यानं घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.

IPL_Entry_Point