Monsoon Update : गणेशोत्सव वरुणराजाला घेवून येणार; महाराष्ट्रात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा
maharashtra weather report : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
maharashtra weather report in marathi : उत्तर भारतातील राज्यांमधील बदलत्या हवामानाचा महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर प्रभाव होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस होत आहे. परिणामी भंडारा, जळगाव आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून अन्य जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि कोकणातील ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांना नारंगी अलर्ट जारी केला आहे. याशिवाय रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे. येत्या २० सप्टेंबरपर्यंत या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा, गडचिरोली आणि जळगाव या जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं उत्तर भारतातील राज्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. परिणामी पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळं निर्माण होत असलेली चक्रिय स्थिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडणार आहे. कारण त्यामुळं मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं आता गणेशोत्सव राज्यात वरुणराजाला घेवून येणार असल्याची चर्चा सुरू आहे.