मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena's Exit: संजय राऊतांच्या वक्तव्यावर कॉंग्रेस, NCP नेते संतप्त

Shivsena's Exit: संजय राऊतांच्या वक्तव्यावर कॉंग्रेस, NCP नेते संतप्त

HT Marathi Desk HT Marathi
Jun 23, 2022 05:57 PM IST

शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Will Shivsena take exit from MVA government
Will Shivsena take exit from MVA government

शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यामुळे पक्षाच्या अनेक आमदारांमध्ये नाराजी होती. गेले अडीच वर्ष पक्षात ही खदखद होती. त्यामुळे महाविकास आघाडीत रहायचेच नाही, असं ठरवून शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदेंची साथ देत बंड केलं, असा सूर गुवाहाटीतून व्यक्त केला जातोय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. जर शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी या आमदारांची इच्छा असेल तर त्यावर पक्ष विचार करेल, फक्त शिवसेना आमदारांनी येत्या २४ तासाच्या आत मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपलं मत मांडावं, असं संजय राऊत आज म्हणाले.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर राज्याच्या सत्ताधारी गोटामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पटोले म्हणाले, ‘२०१९ साली निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांनी आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश दिला होता. त्यामुळे उद्या जर मविआ सरकार कोसळलं तर विरोधी बाकांवर बसण्याची आमची मनाची तयारी आहेच', असं नाना पटोले म्हणाले.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातही चर्चा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘गुवाहाटीला गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढलेला नाही. ते जर मुंबईत आले आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची बैठक झाली तर त्या बैठकीनंतर काय ते ठरवू. या विषयावर आजच काही भाष्य करता येणार नाही.'

जयंत पाटील पुढे म्हणाले की शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’ बंगल्यावर गेले होते. तेथे यासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नव्हती. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या अंतर्गत चर्चा करूनच बाहेर असं जाहीर वक्तव्य केलं असू शकतं.’ असं जयंत पाटील म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या