Cotton Rate In Maharashtra : गेल्या दोन आठवड्यापांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं रब्बी पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात कापसाच्या भावात वाढ झाली असून अकोल्यात कापसाला ८८४० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळं आता आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाचे दर ९ हजार रुपयांवरून साडेसात हजार रुपयांपर्यंत खाली कोसळले होते. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता त्याला साठवून ठेवणं पसंत केलं होतं. परंतु राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर शेतकरी आर्थिक अडचणी सापडले होते. त्यामुळं शेतकऱ्यांना नाईलाजाने कापसाची मिळेल त्या भावात विक्री करावी लागली होती. परंतु आता रब्बी पिकांवर अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालेलं असतानाच अकोला आणि अमरावतीच्या मार्केटमध्ये ८८४० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी चढ्या भावानं कापसाची विक्री केली आहे.
कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्यता...
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत कापसाचं समाधानकारक उत्पादन झालेलं नाही. उत्पादन कमी झालेलं असताना देखील कापसाला चांगला भाव मिळाला नाही. परंतु आता खरीप हंगाम सुरू होत असतानाच कापसाचे भाव कडाडले आहे. सध्या साडेआठ हजार रुपयांचा भाव मिळत असला तरी एप्रिल महिन्याच्या अखेरीस कापसाचा भाव नऊ ते साडेनऊ हजार रुपयांच्या आसपास जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या