मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्हालाही शाह, अग्रवालच लागतात; राणेंकडून कोश्यारींची पाठराखण

कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्हालाही शाह, अग्रवालच लागतात; राणेंकडून कोश्यारींची पाठराखण

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 30, 2022 12:03 PM IST

Nitesh Rane Support BS Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं सध्या राजकीय वादंग निर्माण झाला आहे. त्यातच आता नितेश राणेंनी राज्यपालांची पाठराखण केली आहे.

BJP MLA Nitesh Rane
BJP MLA Nitesh Rane (PTI)

Bhagat Singh Koshyari Controversial Statement On Mumbai : 'गुजराती आणि राजस्थानी लोकांनी मुंबई सोडली तर मुंबईत पैसाच उरणार नाही, मग मुंबई देशाची आर्थिक राजधानीही राहणार नसल्याचं' वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केल्यानंतर त्यावर राज्यातील अनेक नेत्यांनी आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी मात्र राज्यपालांच्या त्या वक्तव्याचं समर्थन करत त्यांनी कुणाचाही अपमान केला नसल्याचं म्हटलं आहे.

राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यामुळं निर्माण झालेल्या राजकीय वादंगावर ट्विट करून आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय की, मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे.. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी.. किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?, तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडलं आहे.

त्याचबरोबर आमदार नितेश राणेंनी शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर मोठा गंभीर आरोप केला आहे. एवढेच कशाला.. तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही?, असा खोचक सवाल नितेश राणेंनी शिवसेनेला विचारला आहे.

राम कदमांनीही केलं राज्यपालांचं समर्थन?

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी देशासाठी आयुष्य अर्पित केलेलं आहे, ते दररोज १८ ते २० तास काम करत असून राज्यपाल कुणालाही भेटण्यासाठी नेहमी वेळ काढत असतात, त्यामुळं त्यांनी केलेल्या वक्तव्याचा संबंध हा राष्ट्रपेमाशी असल्याचं’ म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्यपालांच्या त्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

राज्यपालांचा साधा निषेध तरी करा-शिवसेना

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा साधा निषेध तरी करा, अशी खरमकीत टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. याशिवाय त्यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे, बंडखोर आमदार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राज्यपालांना नारळ द्यायला हवा-कॉंग्रेस

राज्याच्याच राज्यपालांनी राज्यातील मराठी लोकांच्या भावना दुखावल्यानं त्यांना नारळ द्यायला हवा, अशी मागणी कॉंग्रसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे. तर राज्यपालांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळं राज्यातील जनतेची माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या