Anil Deshmukh on Devendra Fadnavis : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी ईडीच्या गैरवापराबाबत केलेल्या आरोपांना दुजोरा देताना माजी गृहमंत्री व ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे यांना अडकवण्याचा प्रयत्नही फडणवीस यांनी केला होता, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना केंद्रातील ईडी, सीबीआयच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यात पहिली अटक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झाली होती. त्यानंतर नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावरही अटकेची कारवाई झाली. कालांतरानं अनिल देशमुख, संजय राऊत यांना न्यायालयानं क्लीन चिट दिली. तर, नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला.
अनिल देशमुख यांच्या अटकेच्या संदर्भात आता नवी माहिती पुढं येत आहे. देशमुख यांना अटकेपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ऑफर दिली होती अशी माहिती समोर आली आहे. शाम मानव यांनी आरोप केल्यानंतर देशमुख यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खोटे आरोप करण्यास मला सांगितलं होतं. एका माणसाच्या करवी त्यांनी माझ्याकडं लिफाफा पाठवला होता. त्यात चार व्यक्तींवर काही आरोप होते. ते आरोप खरे असल्याचं सांगून मी सही केली असतील तर हे लोक अडचणीत आले असते. मात्र मी तसं केलं नाही. त्यामुळंच मला अटक करण्यात आली, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आदित्य ठाकरे यांनाही अडकवण्याचा डाव होता. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिलं, असा आरोप लावा असं मला सांगण्यात आलं होतं, असं देशमुख यांनी सांगितलं. ‘माझ्या शासकीय निवासस्थानी तो माणूस आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी त्याला पाठवलं होतं. या सगळ्याचे पुरावे माझ्याकडं आहेत. माझ्याकडं कोण माणूस आला होता, हे वेळ आल्यावर मी सांगेन,’ असंही देशमुख यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या