Shyam Manav on anil deshmukh arrest : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी केलेल्या गौप्यस्फोटांमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांमुळं लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करतानाच त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं अटक का आणि कशी केली, याची माहिती उघड केली आहे.
ते पत्रकारांशी बोलत होते. देशात ईडीसारख्या यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो हे मानव यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेचं उदाहरण देऊन सांगितलं. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडं काहीच नव्हतं. सुरुवातीला त्यांच्यावर करण्यात आलेला १०० कोटींचा आरोप नंतर सव्वा कोटींवर आला. प्रत्यक्षात त्याचाही काही पुरावा मिळाला नाही. न्यायालयानंही नंतर हेच सांगितलं. मात्र, तरीही त्यांना अटक झाली. कारण, त्यांनी सत्ताधाऱ्यांनी लिहून दिलेल्या चार प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिला होता, असा दावा मानव यांनी केला.
प्रतिज्ञापत्र १ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचे आदेश दिले.
प्रतिज्ञापत्र २ - आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला.
प्रतिज्ञापत्र ३ - अनिल परब यांनी अनेक घोटाळे केले आहेत.
प्रतिज्ञापत्र ४ - अजित पवार यांंनी मला देवगिरी बंगल्यावर बोलावलं आणि गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करा असे आदेश दिले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा पार्थही तिथं हजर होता.
वरील चार प्रतिज्ञापत्रांवर सही केल्यास तुम्हाला ईडीच्या अटेकपासून संरक्षण मिळेल, असं देशमुख यांना सांगण्यात आलं होतं. अनिल देशमुख यांनी खूप विचार केल्यानंतर सही करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना पुन्हा एक ऑफर देण्यात आली. 'अजित पवारांबद्दल बोलणं शक्य नसेल तर इतर तीन प्रतिज्ञापत्रांवर सही करून द्या. देशमुख यांनी सही केली असती तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब आज जेलमध्ये असते, असंही मानव म्हणाले.
सत्ता आल्याबरोबर काही लोकांनी आपली नखं बाहेर काढली आहेत. ईडीचा वापर हा काय प्रकार आहे. संजय राऊत यांच्यावरील आरोप सिद्ध झाले का? त्यांनाही कारण नसताना जेलमध्ये टाकलं गेलं होतं. अरविंद केजरीवाल यांच्याबाबतीतही सध्या हेच सुरू आहे, असं शाम मानव म्हणाले.
शाम मानव यांनी केलेल्या या दाव्यामध्ये तथ्य असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकड एका व्यक्तीच्या माध्यमातून चार प्रतिज्ञापत्रं पाठवली होती. ती त्यांनीच लिहून दिली होती. मात्र, मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो. कोणावरही खोटा आरोप करणार नाही, असं मी ठणकावून सांगितलं होतं, असं देशमुख यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या