गेल्या दोन दिवसापासून कोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. याचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे मार्गावरील दरड दूर करण्याचे काम सुरू असून पोकलेन मशीन घटनास्थळी दाखल झाले आहे. रुळावरील ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.
मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. अनेक गाड्या खेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व खेड स्थानकात अडकून पडल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली. श्री गंगानगर एक्स्प्रेस कामथे स्थानकात, २२१२० मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आणि १२०५२ रत्नागिरी मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत तर १०१०६ सांवंतवाडी-दिवा गाडी दिवाणखवटी स्थानकात थांबवण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी नजीक नातूवाडी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात दगड माती रेल्वे ट्रॅकवर आली आहे. दगड माती आल्याने वाहतूक बंद झाली आहे.
डाऊन मार्गावरील १६३४५ एलटीटी-त्रिवेंद्रम खेड येथे थांबवण्यात आली आहे. १६३३५ गांधीधाम-नागरकोईल VINH स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. १२२८४ हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस मडगावमध्ये थांबवण्यात आली आहे. १२६१९ एलटीटी मंगळुरू रोहा येथे थांबली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून रायगड सिंधुदुर्ग, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, सांगली, सोलापूरला यलो अलर्ट दिला असून सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.
कोकणात तसेच खोपोली, लोणावळा आणि खालापूर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. कमरेइतक्या पाण्यातून वाहनधारक रस्ता काढत आहेत.
संबंधित बातम्या