Maharashtra Weather Updates: राज्यात उष्णतेची लाट आली असून विदर्भात तिघांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये ९ महिन्यांच्या चिमुकलीसह दोघांचा तर बुलढाण्यात एकाचा मृत्यू झाला आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने उच्चांकी गाठली. रविवारी राज्यात अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्ये ४६ अंश सेल्सिअस अकोला जिल्ह्यात ४५.६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दादाजी मारुती भुते (वय- ७० रा. चिचमंडळ, यवतमाळ) आणि विद्या निलेश टेकाम (९ महिने, रा. बेलोरा, यवतमाळ) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर, बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी गेला आहे. सचिन वामनराव पेठारे असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सचिन हा अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रहिवासी होता.
ईशान्य भारतातील तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान शास्त्र विभागाने राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांसाठी २९ आणि ३० मे साठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. तर, येत्या तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
फलोदी (राजस्थान)- ४९.४ अंश सेल्सिअस, मुंगेशपूर (दिल्ली)- ४८.८ अंश सेल्सिअस, निवारी (मध्य प्रेदश)- ४८.७ अंश सेल्सिअस, कांडला (गुजरात)- ४५.३ अंश सेल्सिअस, भटिंडा (पंजाब)- ४८.४ अंश सेल्सिअस, झाशी (उत्तर प्रदेश), रायपूर (छत्तीसगड), नागपूर (महाराष्ट्र)- ४४ अंश सेल्सिअस, उना (हिमाचल प्रदेश) आणि भद्रवाह (जम्मू-काश्मीर)- ३२ अंश सेल्सिअस.
उच्च तापमान बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या वेगवान गुणाकारास मदत करते ज्यामुळे अनेक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि श्वसन संक्रमण होते. आर्द्रता आणि तापमानामुळे जिवाणूंची झपाट्याने वाढ होऊन अन्न विषबाधा होत असल्याने नागरिकांनी दोन ते तीन तासांपेक्षा जास्त काळ रेफ्रिजरेटरच्या बाहेर ठेवलेले खाद्यपदार्थ खायचे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या