Har Ghar Tiranga: मोदी सरकारच्या उपक्रमासाठी शाळकरी मुलांकडून २५ ते ३५ रुपये
भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांना तिरंगा घेण्यासाठी २५ ते ३५ रुपये घेतले जात असल्याचं समोर आलं आहे.
Har Ghar Tiranga: देशभरात यंदा उत्साहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी जय्यत अशी तयारीसुद्धा केली जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा असा उपक्रम सुरू केला आहे. यात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशवासियांनी घरी तिरंगा फडकवावा असं आवाहन कऱण्यात आलं आहे. दरम्यान, याच उपक्रमांतर्गत आता शाळेत विद्यार्थ्यांकडून २५ रुपये तर शिक्षकांकडून २१० रुपये घेण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
अमरावतीत अचलपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून यासंदर्भातील लेखी निर्देश गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखांना पाठवण्यात आले आहेत. यानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील श्रीमंत नागरिक व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह प्रतिष्ठित नागरिकांकडून वेगळा निधी गोळा करण्यात यावा असंही नमूद केलं आहे. शिक्षण विभागाने याबाबत निर्देश दिले असले तरी देण्यात आलेले झेंडे आणि कुटुंबांची संख्या यामध्ये जास्त फरक असल्याचं जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी म्हणाले.
गटशिक्षणाअधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार विनाअनुदानित शाळा यातून वगळण्यात आल्या आहेत. तर खासगी माध्यमिक शाळा, कॉन्व्हेंट शाळांकडून निधी गोळा कऱण्यास सांगण्यात आले आहे. हर घर तिरंगा या उपक्रमासाठी पंचायत समिती स्तरावर जवळपास २२ हजार झेंडे गटविकास अधिकाऱ्यांनी घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अचलपूरमध्ये २४ तासात १ लाख ७३ हजार रुपयांचा निधी
झेंड्याबाबतचे निर्देश पाठवल्यानंतर फक्त २४ तासात केंद्र प्रमुखांकडून १ लाख ७३ हजार रुपये निधी गोळा कऱण्यात आल्याचंही अचलपूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. अचलपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अब्दुल कलीम अब्दुल हकीम म्हणाले की, हर घर झेंडा उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थाकडून २५ तर शिक्षकांकडून २१० रुपये निधी घेण्यास सांगितले होते. त्यानुसार १ लाख ७३ हजार रुपये निधी जमा झाला आहे.
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थ्यांकडून ३५ रुपये
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात विद्यार्थ्यांकडून ३५ रुपये आकारण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील शाळेत विद्यार्थ्यांना झेंड्यासाठी ३५ रुपये आणण्यासाठी सांगण्यात आले आहे. शिवाय शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आय़ोजन केले आहे. जुलै महिन्यात जनजागृतीसाठी २३ तारखेला रॅलीचे आयोजनही करण्यात आले होते.
तिरंगा स्वेच्छेने विकत घेण्यास प्रेरीत करण्याचा आदेश
राज्य शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात तिरंगा हा निशुल्क असणार नाही असं म्हटलं आहे. मात्र त्यासाठी निश्चित किंमत नमूद केलेली नाही. तो स्वेच्छेने विकत घेण्यासाठी लोकांना प्रेरित करावं असं म्हटलं आहे. तसंच प्रत्येक जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषेदला आवश्यक असलेल्या ध्वजांची संख्या निश्चित करण्यासही सांगण्यात आलं आहे. याबाबत केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडून हर घर तिरंगा उपक्रमाच्या आय़ोजनाबाबत सविस्तर असे निर्देशही देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या