Eknath Shinde On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन मार्गातील वंदे भारत एक्स्प्रेसला पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. त्यानंतर पीएम मोदींनी मराठीतून भाषणास सुरुवात करत वंदे भारत एक्स्प्रेसचं महत्त्व सांगितलं आहे. मोदी यांचं भाषण संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे. याशिवाय नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादामुळं महराष्ट्रात सत्तांतर झाल्याचा खळबळजनक खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
उपस्थितांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात सहा ते सात महिन्यांपूर्वी स्थापन झालेलं सरकार हे पीएम नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादानंच स्थापन झालेलं आहे. मोदींमुळं राज्यातील सामान्य जनतेच्या मनातलं सरकार सत्तेवर आलं आहे. नव्या सरकारच्या माध्यमातूनच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर मुंबईतील मेट्रोचं उद्घाटन झालं. आता राज्यात अनेक प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं असून आगामी काळात या प्रकल्पाचं उद्घाटनही मोदींच्याच हस्ते केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आगामी काळात राज्यातील अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करायचं आहे. त्यासाठी आम्ही पीएम नरेंद्र मोदींनाच बोलवू, तुम्ही असंच आम्हाला सहकार्य करत रहा, भारताची पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवणं हे पीएम मोदींचं स्वप्न आहे. त्यात एक ट्रिलियनचा वाटा हा मुंबई आणि महाराष्ट्राचा असेल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.
संबंधित बातम्या