Raj Thackeray PC : राज्यपालांना पत आहे पण पोच नाही; राज ठाकरेंचा कोश्यारींना खोचक टोला
Raj Thackeray On BS Koshyari : गेल्या अडीच वर्षांपासून जवळपास २१ ते २२ महापालिकांच्या निवडणुका पाईपलाईनमध्ये तुंबल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे.
Raj Thackeray On BS Koshyari : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सर्वस्तरातून टीका करण्यात येत आहे. औरंगाबादसह राज्यातील अन्य भागांमध्येही आज कोश्यारींच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. त्यानंतर आता रत्नागिरीच्या दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका केली आहे. त्यामुळं आता राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्यासाठी सर्वस्तरातून भाजपवर दबाव निर्माण होत आहे.
माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी कुणी काही सांगतं की काय, अशी शंका येते. विनाकारण वाद उकरून काढून दुसरीकडे फोकस वळवण्यासाठी व्यूहरचना सुरू असल्याचीही शंका येते. राज्यपाल कोश्यारी यांना पत आहे पण पोच नाही. अशा शब्दांत राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार घेतला आहे. यापूर्वी राज ठाकरेंनी मुंबईतील सभेतही राज्यपालांवर जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आज रत्नागिरी दौऱ्यातही त्यांनी राज्यपालांवर टीका केल्यानं भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका लांबलेल्या असल्यानं त्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
कुणीही उठून इतिहासावर बोलू नये- राज ठाकरे
गेल्या काही दिवसांपासून हर हर महादेव या चित्रपटाच्या दृष्यांवरून राजकीय वाद पेटला आहे. या चित्रपटात राज ठाकरेंनी आवाज दिला असून राष्ट्रवादीविरोधात मनसेनं थेट भूमिका घेतली आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कुणीही उठतं आणि इतिहासावर बोलतं, ही त्यांची ऑथोरिटी नाहीये. इतिहासातील अभ्यासकांकडून, लेखकांकडून किंवा दिग्दर्शकांना भेटा, आधी कागदपत्रं तपासा आणि त्यांना माहिती कुठून घेतली किंवा काय पुरावे आहेत?, हे त्यांना विचारा, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
विभाग