Devendra Fadnavis : राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले...
Devendra Fadnavis On Bhagat Singh Koshyari : भगतसिंह कोश्यारींनी थेट पीएम मोदींकडे पदमुक्त करण्याची मागणी केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
Devendra Fadnavis On Bhagat Singh Koshyari : भगतसिंह कोश्यारी यांनी आधी गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यपालपदातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. परंतु तरीदेखील त्यांचा बदली किंवा राजीनामा घेण्यात आलेला नाही. त्यामुळं यावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढत असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. केंद्रीय नेतृत्त्वाकडे पदमुक्त करण्याची मागणी करण्यापूर्वी कोश्यारींनी माझ्याकडे खाजगीत राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी अनेकदा खाजगीत माझ्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी याबाबत केंद्रीय नेतृत्वाकडे त्यांची इच्छा बोलून दाखवली, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राजभवनातील आतल्या गोष्टीचा खुलासा केला आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील भगतसिंह कोश्यारी यांना त्यांच्या गृहराज्यात परतायचं असल्याचं वक्तव्य केलं होतं. याशिवाय त्यांनी खाजगीत पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचाही खुलासा अजित पवारांनी केला होता. त्यामुळं आता पवारांनंतर फडणवीसांनीही राज्यपालांबाबत मोठा खुलासा केल्यामुळं राज्यपालांना तातडीनं नारळ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मातोश्रीनं दरवाजे बंद केल्याचं दुख:-फडणवीस
शिवसेना आणि उद्धव ठाकरेंशी माझं आजही कोणतंच वैर नाहीये. परंतु ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बनत होतं, त्यावेळी माझा फोन घेतला गेला नाही. माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद करण्यात आले होते. ज्या लोकांसोबत तुम्ही अनेक वर्ष सरकार चालवलं त्यांचा फोन उचलून युती करायची नाही, असं किमान ठाकरे म्हणाले असते. परंतु त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले याचं मला नेहमी वाईट वाटतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.