गडचिरोलीत मोठी दुर्घटना; वैनगंगा नदीत नाव उलटल्याने मिरची तोडणीसाठी निघालेल्या ६ महिला बुडाल्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गडचिरोलीत मोठी दुर्घटना; वैनगंगा नदीत नाव उलटल्याने मिरची तोडणीसाठी निघालेल्या ६ महिला बुडाल्या

गडचिरोलीत मोठी दुर्घटना; वैनगंगा नदीत नाव उलटल्याने मिरची तोडणीसाठी निघालेल्या ६ महिला बुडाल्या

Updated Jan 23, 2024 03:18 PM IST

Gadchiroli Accident : मिरची तोडणाऱ्या महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीत उलटल्याने सहा महिला बुडाल्या आहेत. त्यातील एकीचा मृतदेह मिळाला असून अन्य महिलांचा शोध सुरू आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. वैनगंगा नदीमध्ये नाव उलटल्याने ६ महिला बुडाल्या असून त्यापैकी एकीचा मृतदेह सापडला आहे. मिरची तोडण्यासाठी जात असताना महिलांवर काळाने घाला घातला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. बेपत्ता महिलांचा शोध घेतला जात आहे. चामोर्शी तालुक्यातील गणपूरजवळ  वैनगंगा नदीत ही घटना घडली आहे. 

महिला मिरची तोडण्याच्या कामासाठी जात होत्या. बुडालेल्या एक महिलेचा मृतदेह मिळाला  असून अद्याप पाच महिला बेपत्ता आहेत. गणपूर घाटावरून मिरची तोडण्यासाठी या महिला चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत बोटीतून जात होत्या. नाव पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली. नावेत सात महिला व नावाडी होते. नाव उलटल्याने सर्वजण बुडाले. यातील एक महिला व नावाडी नदीतून पोहत सुखरुप बाहेर आले. तर सहा महिला बुडाल्या त्यातील एकीचा मृतदेह मिळाला आहे.

नावेत ८ लोक होते. ते सर्व गनपूरचे रहिवासी होती. सात महिलांपैकी सारूबाई कस्तूरे सुखरूप बाहेर आली असून जीजाबाई राउत यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर रेवंता हरिदास झाड़े, पुष्पा मुक्तेश्वर झाडे, माया बाई अशोक राउत, सुषमा सचिन राउत आणि बुदाबाई देवाजी राउत या महिला पाण्यात बेपत्ता आहेत. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता महिलांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबतही चौकशी सुरू आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर