Manoj Jarange hunger strike : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ८ जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चवथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा लढा उभारला. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची असून ते यावर ठाम आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाला काही ग्रामस्थांनी विरोध केला होता. दरम्यान, त्यांना उपोषण करण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली होती. मात्र, जरांगे पाटील यांनी पुन्हा ८ जून पासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून गेले चार दिवस त्यांनी काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृतीही चिंताजनक झाली आहे. तसेच त्यांची तपासणी करण्यासाठी आलेल्या पथकाला देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. तसेच सगे सोयरे कायद्यासह इतर मागण्या तातडीने मंजूर कराव्या अशी मागणी पाटील यांनी केली आहे. जशी लोकसभेला फजिती झाली तशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील करून सगळ्यांचे उमेदवार पाडू असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारचे कोणतेही शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले नाही.
जरांगे पाटील हे लोकसभा निवडणूक निकाल लागल्यावर ४ जून पासून उपोषण सुरू करणार होते. मात्र, आचारसंहिता असल्याने त्यांनी त्यांचे उपोषण हे ८ जून पासून सूर करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, त्यांच्या उपोषणाला गावातील काही जणांचा विरोध होता. त्यांच्या गावाच्या आजूबाजूच्या काही गावांनी देखील जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला होता. मात्र, त्यांनी या विरोधाला न जुमानता ८ जूनपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या